Tuesday, February 25, 2014

३७७ च्या निमित्ताने

३७७ च्या निमित्ताने 

सुप्रीम कोर्टाने दिल्ली हायकोर्टाचा निर्णय डावलून डिसेंबर २०१३ मध्ये आपला निकाल देताना 
: LGBT समाज नव्हे पण त्यांचे वर्तन गुन्हेगारीत मोडते असं म्हणून टाकलं,
९९गुन्हेगार सोडून द्यावे लागले तरी चालेल, पण एका निरपरध्याचा बळी द्यायचा नाही असं  म्हणणार्या कोर्टांनी  या सार्या निरपराध लोकांना आयुष्याभर संशयित - अपराधी म्हणून जगण्याची शिक्षा ठोठावली.
: बाकी सार्या अल्प संख्यांक समाजांवर अन्याय होऊ नये म्हणून वेळेला बहुसंख्यांकांना बाजूला ठेवून त्यांचं हित बघणारा आमचा कायदा आमच्याच LGBT समाजाला अल्पसंख्यांक म्हणून मानवाधिकार नाकारत आहे!
LGBT चा न्याय मिळवण्यासाठीचा हा लढा जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर चाललेला आहे.
 आणि आपण! समाजात डोळसपणे वावरताना असं वाटतं, आपण आपली सन्वेदनशिलताच हरवून बसलो आहोत का?
माझ्या आसपास घडताना ऐकलेली व पाहिलेली ही घटना:
मेर्थ हा तुर्कस्तानी मुलगा.अंतरराष्ट्रीय शाळेत हायस्कूलमध्ये शिकणारा.अभ्यासाबरोबर पियानो वाजवणं हा त्याचा छंद . त्याच्या पियानो वादनात एक वेगळंच माधुर्य आहे.  पलक गाणं छान म्हणते. त्यामुळे दोघांची मैत्री जमून गेली. music concert मध्ये दोघांचाही सहभाग असे त्यामुळे भेटी वरचेवर होत. 
पलक पुढच्या शिक्षणासाठी लंडनला निघाली, तेव्हा तिच्या बाकीच्या मित्र मैत्रिणींच्या प्रमाणे मेर्थच्याही डोळ्यात पाणी आलं. इतके दिवस आपण पलकला बोललो नाही, पण आता तिला सांगितलंच पाहिजे असं वाटून मेर्थनि तिला मेसेज पाठवला 'पलक, मी गे आहे.'
पलक चमकली. पण मनातून खरंतर तिलाही हे जाणवलं होतंच! तिने लगेच reply केला .
'Cool . Call  me  when you feel like talking .'
' मेर्थचा त्यावर कॅपिटल लेटर्स मधला thanks आणि एक smily असं उत्तर पाहून पलकलाही बरं वाटलं.
यानंतर पाचच महिन्यांनी पियानो वादनासाठी मेर्थला लंडनला जायचं होतं.
 पलकलाही आनंद झाला.पलकने त्या चार दिवसांसाठी planning  ही बरंच केलेलं होतं. shopping , indian रेस्तौरन्त मध्ये जेवण, नव्या friends ची इंट्रो आणि संध्याकाळी कॉफीबरोबर भरपूर गप्पा ! 
मेर्थ आल्या दिवशी संध्याकाळी कॉफी घेताना पलकला म्हणाला, 'thanks पलक, मला समजून घेतलस तू! यापूर्वी एकही straight  व्यक्तीशी मी स्वतः बद्दल काहीही बोललो नाहीये.
पलकला आठवलं. international school मध्ये finance साठी admission घेतली,तेव्हा वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या होती १५. शाळा सुरु झाल्यानंतर ५-६ दिवसांनी join झालेला Patrick जरi वेगळ्याच चालीत तिच्याजवळ आला आणि 'hi I am Patrick ' असे म्हणाला,तेव्हा ती अवघडूनच गेली होती एकदम! 'Hi .पलक. ' ती गडबडून म्हणाली. नंतर ग्रुप मध्ये एकमेकांशी गप्पा होत होत्या , तरीहि हे अवघडलेपण राहिलंच होत काही दिवस! नंतर मात्र ती रुळली.
"खरं तर कुणालाच हे माहित नाही. मी लपवतो सर्वांपासून मला. कितीही कठीण असलं तरीही.
१२ वर्षांचा असताना एका क्षणी मला जेव्हा कळलं कि आपण वेगळे आहोत इतर मुलांपेक्षा, तेव्हा शॉक बसला होता केवढा मोठा! आधी भीती, स्वतः विषयी एक विचित्र परकेपणाची भावना!
मग तेव्हापासून स्वतःचाच स्वतःशी झगडा चालू झाला रात्रंदिवस.
का? मीच का वेगळा इतरांपेक्षा? माझ्यातच काही कमी आहे का? का मी वाईट मुलगा आहे? आणि बाकीचे सगळे चांगले आहेत? मीच - मीच वाईट आहे बहुतेक! पण मला चांगलं बनायचंय .
सगळ्यांसारखं बनायचंय मला. सगळ्यांसारखं बनायला हवंय , पण ते व्हावं कसं? कारण पलक, मी माझ्यासारखाच होतो. मी इतरांसारखा कसा बरं होणार? 
स्वतःला हे असं accept करायला खूप ......खूप वेळ लागला. आणि समाज! 
जेव्हा कळलं, की मी gay  आहे, त्या क्षणीच , इतक्या छोट्या वयातच 'समाज काय म्हणेल '
चं न पेलवणारं ओझं माझ्या खांद्यावर येउन पडलं . अगदी एकट्याच्या! कारण त्याच क्षणी लक्षात आलं होतं ,की असं वेगळेपण समाजाला मान्य नाही . त्यामुळे आपली कुचेष्टा तर होईलच, परंतु शाळेतले इतर विद्यार्थी - विद्यार्थिनी आणि समाज आपल्याला वाळीत टाकेल . आपल्याशी कुणी बोलणारही नाही. सगळे आपला तिरस्कार करतील .आपण वेगळे आहोत असं कळलं, तर आपल्याला शाळेतूनही काढून टाकतील का?  आपली
ही चिंता , काळजी, भीती कुणाशी तरी बोलून मन मोकळं केल की कमी होते .कुणाशी बोलणार पण?आपल्याला जन्मल्या पासून सगळ्यात जवळची असते, ती आई ! तिला हे मी कसं सांगणार? आणि माझं छोटंसं कुटुंब .बाबा, छोटा भाऊ आणि धाकटी बहिण .त्यांनाच मी हे सांगू शकत नव्हतो . लाज, त्यांच्या, आपल्या अगदी जवळच्यांच्या - नजरेतून आपण उतरू -हि आशंका.डोक भणाणून जायचं. कश्या - कशात लक्ष लागायचं नाही . गुन्हेगारा सारख जगायचं आपण आपल्याशीच .या सगळ्यातून आलेला एकलकोंडेपणा! मग या टेन्शननी स्वभाव मूडी बनत गेला. साध्या -साध्या गोष्टींवरून रागावणं , चिड-चिड करण अशा गोष्टी होऊ लागल्या. मन हळव बनलं. साधे- सहज बोललेले शब्दही जिव्हारी लागू लागले. असह्य सगळंच!
आणि त्याही पेक्षा अवघड म्हणजे सर्व शक्तीनिशी आपण वेगळे नाही आहोत, सामान्य मुलगाच आहोत हे भासवण्या साठी स्वतःच्या खोली बाहेर आल्या बरोबर -एक नवiच मुखवटा- नवाच कोट- अंगावर चढवायचा. सामान्य मुलांप्रमाणे वागायचं - बोलायचं. स्वतःच मन आणि शरीर काबूत ठेवायचं. थकून जातो अगदी आयुष्याच्या या झगड्यात. 
आमच्या धर्माला मान्य नाही ग homosexuality , त्यामुळे आयुष्यभर कुचंबणाच होणार माझी. समाजाचं सोड- माझ्या घरच्यांना- माझ्या वडिलांना जर हे कळलं न, तर मला घराबाहेर काढतील . माझ्याशी कधीही कुणीही कशाही प्रकारचा संबंध ठेवणार नाही! सहन होत नाही हे दडपण ! 
बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.पलक माझी लाडकी भाची .त्यामुळे भेटली कि गळ्यात पडून मावशी ग ..माहिताय का असं म्हणत मनातल्या सगळ्या गोष्टी एखाद्या मैत्रिणी प्रमाणे शेअर करते. यावेळीही तिने मेर्थबद्दल मला सारं सांगितल .म्हणाली, रितूला जेव्हा भारतात फोन करून सांगितलं ,तेव्हा ती म्हणाली " इ ! गे! मला तर अजिबात आवडणार नाही अशा लोकांच्यात वावरायला. आणि मला भीती पण वाटेल. त्याचं वागण , बोलण  किती वेगळ असत ! मी अशा लोकांपासून चार हात दूरच असते. त्यांच्याशी मी कधीच नाही बोलू शकणार! "
"अग असं काय बोलतेस! " पलक ने रागावून म्हटलं होत ," ती देखील माणसेच आहेत न! त्यांनाही आपल्यासारख मन, भावना आहेत. आपला जर कोणी तिरस्कार केला, आपल्याला वेगळं म्हणून समाजाबाहेर टाकल, तर आपल्याला कस वाटेल? तेवढच आणि तसच दुक्ख त्यानाही होईल न? बघ, विचार कर!" 
मला सुरेश भटांच्या ओळी आठवल्या 
' जगताच्या सिमांतून
आहे मी हद्दपार !
ज्याने त्याने केले 
मज बघून बंद दार!

मावशी, मेर्थ म्हणाला, " हा समाज जर आम्हाला स्वीकारत नसेल,  तर  कुठे जायचं आम्ही? कुठे
 राहायचं?-
मावशी, अग त्याला स्वतःला स्वतः सारख वागता येत नाही! त्याला आपल व्यक्तिमत्वच जर लपवून ठेवाव लागत असेल, तर त्याला स्वतःला शोधण कस शक्य होणार? त्यानं स्वतःला ओळखायचं तरी कस? वेग वेगळ्या परिस्थितींमध्ये आपण जसे वागतो, प्रतिक्रिया देतो, त्याच्या मधुनच आपण स्वतःला ओळखत असतो, शोधत असतो. आणि त्यातूनच आपल्याला समजत जात, आपण कोण आहोत ,किव्वा काय होऊ शकतो .
स्वाभाविक वागणंच जर लपवायचं, तर मग स्वतःला ओळखूनच घ्यायच नाही का? हि केवढी मोठी शिक्षा आहे! 'मी कोण आहे यावर कायमचंच प्रश्नचिन्ह का? 
समाजातल्या काही व्यक्तींनी आपल्या सहज, उपजत प्रवृत्तीन्प्रमाणे वागयचच नाही का? तस वागणं हा गुन्हा होतो का ?त्यांना पाहून आपल्या पैकी अनेक जन त्यांना टाळतात , त्यांना हसतात, वेडे वाकडे शब्द उच्चारतात . हि आपली प्रतिक्रिया असते.इथे कळतो शिक्षण घेण आणि सुशिक्षितपणा यातला फरक ! हे बदलायला हवय मावशी!"
मला वाटलं, किती पूर्वग्रह दुषित , पक्षपाती वागणूक असते आपली! आपण त्यांना व्यक्ती म्हणून ओळखण्यiआधीच त्यांच्याशी पक्षपाती व्यवहार करतो .अर्थात, पूर्वग्रह बनणे हि  स्वाभाविक प्रक्रिया आहे. आणि त्यानंतर आपली आवड आणि नावड त्यातूनच निपजते. पक्षपाती वागणूक दिली जाते. एखाद्या व्यक्तीची एखादी सवय किव्वा त्याचा वेगळेपणा आपल्याला खटकला  तर आपली वागणूक पक्षपाती होते .आणि पूर्वग्रह  दुषित वागणूक मिळण हे नैराश्याच प्रमुख कारण आहे. अशा  अकारण पक्षपाताला बळी पडलेल्यांना जीवना विषयाच्या निराशेने ग्रासून टाकणं किती घातक आहे!  माणसांचे विचार, भावना ,आणि वागणूक यांचा प्रभाव इतरांवरही पडतो. जगाकडे एक तर चांगल किव्वा वाईट अशा ताठर भूमिकेतून पाहून नाही चालणार. जेव्हा आपल्या या नावडीची कक्षा ओलांडून त्याच रुपांतर तिरस्कारात होतं, आणि त्यानंतर सगळ्या सीमा ओलांडून आपण हिंसेच्या मार्गाला लागतो.
मग जमेका मध्ये चार मित्र जेवत बसले असताना घराचा दरवाजा तोडून हिंसक जमाव त्यांना तुम्ही समलिंगी असे म्हणत  मारपीट करतो. भारतामध्ये आपल्याच गे नातेवाइकवर आपण दगडफेक करतो, आणि त्याची घरची माणसे त्याला दरवाजे बंद करतात. कुणी समलिंगींना  नुसता पाठींबा जरी दर्शवला, तरी रात्री बुखारेस्त च्या रस्त्यांवर तो मृतावस्थेत आढळतो. गे प्राईड परेड मध्ये भाग घेणार्यांवर  रशियात प्राणघातक हल्ला होतो . कुणी आपल्या मित्राला(!) सहज गे आहे असे फेसबुक वर म्हटल्यावर मला आणि माझ्या कुटुंबाला समाज जगण नकोस करेल या भीतीने तो स्वतःच याजगाचा निरोप घेतो....किती उदाहरण द्यायची!  त्या आपल्या वागणुकीला काय म्हणायचं?आपल्याला या माणुसकीहीन वागणुकीची लाज वाटायला हवी.
समलैंगिक असणं हा काही एखादा रोग नव्हे , न कोणता मानसिक आजार.वेळोवेळी  शास्त्रीय दृष्टीकोनातून या विषयीचा अभ्यास होऊन science journels मधून हे प्रसिद्ध झालेले आहे, कि भिन्नलिंगी प्रमाणेच समलिंगी असणं हे हि नैसर्गिक आहे .
जगात १५०० प्राण्यामध्ये समलैङ्गिकता आढळते.अगदी फुलापाखरांपासून ते हत्तिन्पर्यन्त ! यापैकी काही प्राण्यांच्या या संबंधांचे कधी आपणही साक्षीदार असतो.
प्राचीन काळापासून इतिहासात वेगवेगळ्या देशान मधील रहिवाश्यांच्या समलैंगिक संबंधांचे पुरावे- उल्लेख त्यांच्या साहित्यात व चित्र-शिल्प  कृतींमध्ये आढळतात . चीनी भाषेतील dream of  the red chamber हिअभिजात साहित्यकृती, आफ्रिकन इजिप्शिअन ख्नुम्होतेप व नियान्ख्नुम या पुरुष जोडप्याचा इतिहासातील उल्लेख ,मनुस्म्रुतिमधिल हिजड्यांचा उल्लेख,खजुराहो तील शिल्पकृती , याच विषयावर आधारलेली मिहाइल कुझनिक ची प्रसिद्ध  रशियन कादंबरी wings , सोफिया पर्नोक आणि मरीन स्वेतिहा यांच्या लेस्बियन कविता आणि मैत्री, सोक्रेतिस, लॉर्ड बायरन , दुसरा एडवर्ड यांनी जाहीरपणे केलेला स्वतःचा गे किव्वा बाय सेक्षुअल असा उल्लेख..ग्रीस आणि रोम मध्ये समलैङ्गिकतेलi समाज मान्यता होती.कित्येक जण देशाची लोकसंख्या मर्यादित राहते या दृष्टीने या संबंधान कडे पाहत असत.
पण जसजसा ख्रिश्चन आणि पश्चिम आशियायी किव्वा अब्राहमिक धर्मांचा प्रसार होत गेला, तसतसा या धर्मांवर आधारलेल्या संस्कृतींनी समाजात समलिंगींना बेकायदेशीर घोषित केले. त्यांना मृत्युदंड आणि कारावासाच्या शिक्षा दिल्या .
रोमानिया :
नेला नावाच्या रोमानियन executive  ऑफिसर शी गप्पा मारत असताना समलिंगी संबंधान बद्दल बोलणं स्वाभाविकपणे झालंच. "३७७ कलमाप्रमाणे भारतामध्ये समलिंगी संबंध बेकायदेशीर आहेत. पण रोमानियात असे संबंध असण हा कायद्याने गुन्हा नाही . गेल्या दशकात रोमानियाने याबाबत बरीच मजल मारली आहे. लैङ्गिक्तेवर आधारित भेद भाव करणार्यांना कायद्यात शिक्षेची तरतूद आहे. समलिंगी व्यक्तींचा तिरस्कार करणार्या व्यक्तींना कायद्याने शिक्षा ठोठावली आहे.राजधानी बुखारेस्त मध्ये वार्षिक ' गे फेस्त प्राईड परेड ' व ' गे फिल्म नाईट्स फेस्टिवल्स ' आयोजित केल्या जातात. १९९६ पासून ऑपरेशन द्वारे लैंगिकता बदलणे, आणि त्याप्रमाणे official documents मध्ये कायदेशीर बदल करण्यास परवानगी आहे. 
२००५ मध्ये तरोम या राष्ट्रीय विमान कंपनीने वलेन्ताइन च्या दिवशी जोडप्यांसाठी सवलतीचे दर घोषित केले होते. गे जोडप्यासाठी हा सवलतीचा दर तरोमने नाकारल्या बद्दल त्यांना दंड ठोकण्यात आला आणि हि चूक दुरुस्त करण्याबद्दल तंबी देण्यात आली होती.
परंतु २०१३ च्या काळात शाळेत LGBT month  च्या निमित्ताने त्यांच्या प्रश्नांविषयी विद्यार्थ्यांशी बोलल्याने आणि या निमित्ताने असलेल्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आवाहन केल्याने त्याचा तीव्र निषेध पालकांनी केला, धर्मगुरूंनी केला आणि आता कोर्टात या संबंधी केस चालू आहे. 
USA, UK आणि बर्याच देशान प्रमाणे रोमनियातहि STI (sexually transmitted infections.) च्या वाढत्या शक्यतेमुळे गे व्यक्तींना रक्तदान  मात्र करता येत नाही. त्यांच्या लग्नालाही कित्येक देशांप्रमाणे रोमानियात परवानगी नाही.परंतु कायद्याची तरतूद असूनही समाज मात्र गे व्यक्तींना आपलेसे करत नाही. त्यांच्याशी भेदभावानेच वागतो. नेला म्हणते ,' परेडस करण्याची काय आवश्यकता आहे? तुम्ही तुमच्या घरी काय करता याच्याशी आम्हाला काय करायचंय ?आमच्या धर्मात असे संबंध अनैसर्गिक मानले जातात. त्यामुळे अशा संबंधांबद्दल समाजात काहीही बोलले जात नाही.'
 मी मनात म्हटलं ,"त्यांना हवेत त्यांचे मानवी अधिकार आणि स्वातंत्र्य .समाजाने नाकारलेल्या  या व्यक्तींना स्वतःच छोटंसं घरकुल हव आहे. त्यांना हव आहे आपापसात लग्न करण्याच स्वातंत्र्य . दत्तक घेण आणि मुलाचं पालकत्व .नोकरी आणि access to health care . अल्पवयीन  गे मुलांना समाजाने त्रास देऊ नये म्हणून त्याविरुद्ध कायदा . त्यांना हवंय स्थैर्य . अखेर समाजातील प्रत्येक व्यक्तीला तरी काय हव असत ? स्थैर्यासाठी कुटुंब आणि समाजमान्यता! स्वतःची एक ओळख.त्यांना जगण्यासाठी support हवा आहे! आपल्याला तर मृत्यू नंतरही support हवा असतो! म्हणून तर मुलगा हवा, नातेवाईक हवेत.जीव नसलेल्या शरीराला सुद्धा सन्मानाने वागवाव अशी अपेक्षा आहे!  आणि तशी तरतूद करण्याचा प्रयत्न आपण आयुष्यभर करत असतो!

" आणि त्यांनी आमच्या लहान मुलांना नादाला लावले वा त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही ऐकून घेणार नाही!' 
नेलाने अगदी कडक शब्दात सांगितले," सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे रोमानियात orthodox चर्च मध्ये काम करण्यासाठी लग्न झालेले असणे जरुरी आहे. "रोमानियात ९९ टक्के लोक orthodox आहेत.हि माणसे धर्मभिरु आहेत. आणि त्यांच्या चर्च मध्ये लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होत नाहीत,कारण orthodox  चर्च मध्ये काम करण्याची शैक्षणिक पात्रता जरी तुम्ही मिळवलीत, तरी चर्च मध्ये काम सुरु करण्यापूर्वी लग्न करण्याची संधी प्रत्येकाला मिळते! याउलट कॅथोलिक चर्च मध्ये काम करण्यासाठी अविवाहित असणे बंधन कारक आहे. चर्च मध्ये काम करणार्यांचा बाह्य जगाशी संबंध अगदीच कमी होतो.
समलैंगिकता नव्हे, अत्याचार :
कॅथोलिक चर्च मध्ये काम करणार्यांना लग्न करता येत नाही .याकारणाने त्यांचे आयुष्य नॉर्मल नाही. व याचा परिणाम म्हणजे त्यांचे अत्याचार! संपूर्ण जगातील कॅथोलिक चर्चचे धर्मगुरू, नन्स, आणि  चर्चशी निगडीत इतर व्यक्तींवर अजाण मुलांवरील अत्याचाराच्या असंख्य केसेस आहेत . या शोषणामुळे कित्येक मुलांनी आत्महत्त्या केलेल्या आहेत.. साहजिकच नेला सारख्या पालकांना मुलांची काळजी वाटते. 
याच्याच सारख्या घटना  सैन्यातही घडतात. रशियन सैन्यात अशा प्रकारची समलैङ्गिकता हा चिंतेचा विषय आहे. सैनिकांना वर्षानुवर्षे घरी न जायला मिळाल्याचा परिणाम. यात किती तरी नव्याने भरती झालेल्या सैनिकांना आपल्या इच्छे विरुद्ध अशा अत्याचारांना बळी जावे लागते. अर्थात इतर राष्ट्रांतही सैन्यात आणि  तुरुंगात   अशा प्रकारच्या घटना घडत असल्याच्या बातम्या आपण वाचतो.
( प्राचीन ग्रीस मध्ये जो समलैङ्गिकतेचा प्रभाव समाजावर आढळतो, ती नैसर्गिक समलैङ्गिकता नव्हे. ग्रीक लोकांना असलेला स्वतहाच्या सौंदर्याचा अभिमान .बुद्धीचा अहंकार! आणि प्रेम करण्यासाठी आपल्या बरोबरीची - जिच्याशी बौद्धिक चर्चा हि करता येईल अशी -व्यक्ती हवी. म्हणून १२-१३ वर्षांच्या मुलांना अशा मार्गाला लावणे व त्यांना शिक्षित करणे. कारण स्त्रिया म्हणजे फक्त मुले व घर सांभाळणार्या! तेवढीच त्यांची योग्यता!    हे  संबंध     मध्यमवर्गीय पुरुष आणि पौगन्दावस्थेतिल   मुले यांच्यात असत .)
पण हि काही   समलैङ्गिकता नव्हे! हे अत्त्याचार आहेत. प्राचीन काळी रेप ची व्याख्या होती मुलगा, स्त्री वi कोणावरही केलेली जबरदस्ती.स्वताहाच्या हक्कांची मर्यादा जर दुसर्याच्या हक्कांचे उल्लंघन करू लागली , तर असे अत्त्याचार होऊ लागतात . आणि याचा संबंध लैंगिकतेशी नाही. 
१९६७ मध्ये ब्रिटन मध्ये समलिंगी संबंधांना मान्यता मिळाली .साधारणत. १९९० पासून जगात वेगवेगळ्या देशात गे कार्यकर्त्यांनी मानवधिकरान्साठी चालवली सुरु केल्या . अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया , दक्षिण अमेरिकेतील काही राष्ट्रे यांनी समलिंगी संबंधांना हळू हळू मान्यता दिली. व इतरही काही अधिकार उदा. मुल दत्तक घेणे, समलिंगी व्यक्तींचा तिरस्कार करणार्यांना कायद्याने शिक्षा , शिक्षण क्षेत्र , नोकर्यांच्या जागी पक्षपात होऊ नये यासाठी पक्षपाता विरुद्ध कायदा. आज अमेरिकेतील काही राज्यात व युरोपमधील काही राष्ट्रात समलिंगींना लग्न करण्यास कायद्याने परवानगी आहे.परंतु बरीचशी आफ्रिकी राष्ट्रे,अनेक आशियायी राष्ट्रे, रशिया यांनी कायद्याने या संबंधांना मान्यता दिलेली नाही. 

मेर्थ ला  लंडन मध्ये चार दिवस का होईना, मनाप्रमाणे राहण्या वागण्याचे स्वातंत्र्य मिळाले. पलक च्या friends बरोबर शॉपिंग करताना त्याने सर्वात प्रथम मस्कारा, nail  polishes , आणि इतर make - up चे समान खरेदी केले. दुसर्या दिवशी तिच्या मैत्रिणींनी tyaala मेकप करून , नटवून, लंडन मध्ये फिरवले. त्याचे ( मुलीन्प्रामाणे असणारे  ) मूड स्विङ्ग्स , सहज हळवे होणे, अतिकाळजीपूर्वक  ड्रेस अप  होणे, आणि इतर आवडी निवडी  पलकने पहिल्या. ज्या मेर्थला ती ओळखत होती, तो हा मेर्थ नव्हताच ! हि कोणी दुसरीच व्यक्ती होती ! 
पलक मला म्हणाली, मावशी भावना प्रत्येकाला असतात . पुरुष बर्याचदा त्या बाहेरून दिसून देत नाहीत आणि मेर्थ च्या वागण्या बोलण्यातून त्या चटकन दिसून येत असतील  तर तो माणूस नाही का?
चार दिवसांनी परत निघताना खरेदी केलेली सारी ज्वेलरी , nail   polishes , मेर्थ ने पलक जवळ दिली. 'मेर्थ, कधी ना कधी तुला तुझ्या कुटुंबाला हे सांगायला हव. कुणास ठाऊक, कदाचित तुझ्या भावना ते समजूनही घेतील!'
'हो. हे चार दिवस स्वतः सारखे जगून घेतi आल्यामुळे माझे टेन्शन कमी झाले आहे. घरी भावंडांशी किव्वा आईशी बोलणे शक्य नाही, कारण पलक, पहिल्या पासूनच मला अशी सतत भीती वाटत आलेली आहे कि माझे वास्तव कळले तर आई ला hart  attack  येईल . मला माझ्या वडिलांशी याबाबत बोलायचे आहे. पण त्याआधी मी छोटीशी का होईना , नोकरी शोधणार आहे. स्वतःच्या पायांवर उभा राहून मग परिणामांना समोर जायची माझी जेव्हा तयारी होईल, तेव्हा मी वडिलांशी बोलीन.'
मेर्थ च्या आवाजातला आत्मविश्वास पलकला त्याच्यातल्या बदलाची नांदीच वाटला.समाजाने आपल्याला स्वीकारला, तर जगण्याची उभारी येते, नाही का ?

आमची पवित्र लग्न संस्था असली समलिंगी लग्ने मान्यच करू शकत नाही असा धर्म रक्षकांचा ओरडा जगभर ऐकू येतो आहे. आणि समज पुढारतो आहे ,बदलतो आहे म्हणून live इन रिलेशन शिप ला त्यांचा कायदा मान्यता देतो आहे न? मग निसर्गतःच समलिंगी असलेल्यांना तो का स्वीकारत नाही?  
सर्व धर्मन्हुन  श्रेष्ठ धर्म आहे माणुसकीचा.सर्वप्रथम  आपल्याला या धर्माच पालन करायला हव  माणसान माणसाशी माणुसकीन वागायला हवंय. आपण एकमेकांना स्वीकारणं  हि पहिली पायरी आहे.   कायद्याने    समलिंगी असूनही, समाज स्वीकारत नसल्याने पालकांच्या जबरदस्ती मुळे आज  मुलांना भिन्नलिंगी मुलींशी लग्न कराव लागतं, त्या मुलींची आणि त्यांच्या कुटुंबांची अशी फसवणूक हा अपराध आहे.पण या अपराधाला जबाबदार कोण? समलिंगी मुला मुलींचं नैसर्गिक आचरण हाच गुन्हा मनाला गेला तर वाढते black mailing  चे प्रकार harassment  आणि त्यातून गुन्हेगारी कृत्ये , विघातक कृत्ये ....यासर्वांना जबाबदार कोण? समलिंगी मुलाचं frustration ,depression , त्यातून  त्यांनी   केलेल्या आत्महत्या , अविचरनि   illegal drugs  घेण, unprotected  लैंगिक व्यवहार करणं, त्यातून होणारे रोग, या सगळ्या दुर्दैवी गोष्टींच मूळ नेमकं कशात आहे? हा प्रश्न आपण आपल्यालाच करण्याची वेळ आली आहे. समाजातल्या काही घटकांना आपण आपल्यासारख जगण नाकारण ,त्यांना नोकर्या नाकारण हि खरीच गटबाजी नाही का? समाज व्यवस्था व तिचे नियम 'जगा आणि जगू द्या 'पेक्षा वेगळे नाहीत. 
आज कायद्याने या संबंधांना  काही देशांनी मान्यता दिली आहे, पण या सगळ्या देशांतल्या समाजाने त्यांना स्वीकारले आहे का? हा महत्वाचा प्रश्न आहे.
मेर्थला आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्क बसला, कारण त्याच्या वडिलांनी त्याला समजून घेतल,  पण त्यांनी व्यथित स्वरात असा हि म्हटल ,' बाळ, तरीदेखील या समाजात राहून मी तुला पाठिंबा नाही देऊ शकत. तुला परदेशातच जाऊन राहावे  लागेल, अशा ठिकाणी, जिथला समाज तुला समजून घेईल '

आज कायद्याने या संबंधांना मान्यता दिली, व त्यामुळे स्वैराचार वाढला तर? fashion , fad , time-pass  यासाठी समलिंगी संबंध हा आणखी एक पर्याय झाला तर ? आणि अशा संबंधांना मान्यता मिळाल्यावर त्याचा अति- आचार इतरांच्या वैयक्तिक हक्कांवर गदा  आणीत सुरु झाला तर? किशोरवस्थेतुन तारुण्यात प्रवेश करणाऱ्या मुलांना चुकीच्या मार्गाला लावले गेले तर?  देशाच्या लोकसंख्येवर परिणाम झाला तर  ?     एका अर्थी समाजव्यवस्थेला धक्का लागेल का? 
आपले आचार व विचार संयत असतील तरच आपण खर्या अर्थाने सुंदर आयुष्य जगू शकतो. पण संयम सुटायला हे आणखी एक कारण झाले, तर?  हि भीती समाज व्यवस्थपकान्ना वाटत असेल का? 
पण या प्रश्नांची उत्तरे समलिंगी व्यक्तींचे अस्तित्व  नाकारण्यात आहेत का?  आणि  इतर बर्याच देशांप्रमाणे भारतातहि आज ज्यांना आपण नाकारत आहोत, त्यांनी कुठे जायचं ? त्यांनी सुद्धा पश्चिमी राष्ट्रांकडे निर्वासित म्हणून जायचा हा एकाच पर्याय आपण त्यांना शिल्लक ठेवला आहे का?
२०११ मध्ये युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कौन्सिल नि LGBT व्यक्तींच्या मानवीय अधिकारांना मान्यता दिली. कौन्सिल नि म्हटलंय, कि STI रोग होऊ नयेत म्हणून काळजी घेत येईल, रोगांना आटोक्यात आणता येईल, पण लैंगिक orientation बदलता नाही येणार!  आज गरज आहे आपणच स्वतःला प्रश्न विचारण्याची, कि मी सुशिक्षित कधी होणार? मी सहिष्णू कधी होणार?

समाजातील सर्व घटकांनी एकमेकांना स्वीकारल्यावर कायदा सुद्धा नवे बदल स्वीकारून नव्या रुपात पुढे येईल ...

उज्ज्वला अन्नछत्रे,
रोमानिया .

Wednesday, February 20, 2013

मला भेटलेल्या कविता – ३



हळुवारपणे उतरते प्रेम-कविता निकिता स्तनेस्कूच्यi लेखणीतून..
जितका बुद्धिमान, तितकंच संवेदनशील मन ! सहज-सहज त्याची कविता ओघळते ...अर्थ होऊन.
रोमानियन भाषेमध्ये त्याच्या कवितेला एक नकळत असलेली लय आहे,
भाषांतरात त्याचं सौंदर्य नाही उतरता येत...
कारण शब्दशः अनुवादात अर्थाची तरलता हरवून जाते
म्हणून स्वैर अनुवादाच निदान थोड्या फार प्रमाणात
मूळ कवितेशी समांतर जात राहतो , असं मला वाटतं !
निकिता स्तनेस्कूच्या काही प्रेम कवितांचा आस्वाद घेऊ या..

एका गुरुवारी...प्रेमपूर्वक

संध्याकाळी एका गुरुवारी ,संध्याकाळी हृदय-भरल्या
जेव्हा संचित बहरलं होतं
वसंत-ऋतूतल्या तृणासारखं

मी प्रेम केलं तुझ्यावर
इतकं, कि विसरलो तुला...
वाटलं, माझाच आहेस तू एक भाग !

अन तेंव्हा चकित झालो
मी हसलो होतो, पण तू ..
नाही हसलीस

जेंव्हा झाडांची पानं हलकेच खुडली मी
अन तू..
त्यांखालीच रेंगाळलीस , जरा जास्त ....

अन त्या क्षणी
उमजलं ,
कि तू होतीस कुणीतरी वेगळी
पण फक्त तशी, जसा –
संध्याकाळचा सूर्य असतो वेगळा –
........चंद्र !!!

Tuesday, February 19, 2013

रोमानियन कविता आणि मी....

रोमानियाला राहायला गेले, आणि तिथल्या गलात्स या छोट्या शहरात मला ती भेटली ! नव्या देशात राहायला गेलं म्हणजे पहिल्यांदा तिथली भाषा निदान जरुरी पुरती शिकणं आलंच !
आणि केवळ या कारणासाठीच तिची माझी भेट होणं अपरिहार्य होतं ! ती रोमानियन भाषेचे धडे देण्यासाठी माझ्या घरी आली. सुंदर बांधा, सुरेख लालसर गोरा रंग आणि एखाद्या लहानशा.. उत्सुक मुलीचे असावेत असे विलक्षण बोलके डोळे ! मी क्षणभर पहातच राहिले. बोलण्या वागण्यातली अदब आणि आत्मविश्वास मला आवडून गेला. हातात हात घेत आम्ही एकमेकींची ओळख करून घेतली.
‘मी तमारा.’ ‘मी उज्ज्वला.’
‘तुझ्या नवर्यालाही मीच रोमानियन भाषा शिकवली.’ ती म्हणाली आणि हसली.
फारतर १८-२० वर्षाचं वय असणारी तमारा शिक्षिकेच काम करते, म्हणजे लहानपणापासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असावी, मी मनात म्हटलं. अरुण आधीच रोमानियात राहायला आला असल्याने त्याचं रोमानियन शिकून झालं होतं ..अर्थात जरुरीपुरतं. कारण ऑफिस च्या कामासाठी दुभाषिकांची सोय असते.
मी चैतन्याची ओळख करून देत म्हटलं, “ही ११ वीत आहे. बुखारेस्ट च्या आंतरराष्ट्रीय शाळेत.” ती म्हणाली ,”तर मग चैतन्या, तुला तिथे रोमानियन विद्यार्थी-विद्यार्थिनी देखील भेटतील.आणि रोमानियन भाषा शिकण्याचा लगेच उपयोग करता येईल.”
तिने गप्पांच्या ओघात मला एका ६-७ वर्षांच्या मुलाचा फोटो दाखवत म्हटलं, “हा माझा मुलगा, डेव्हिड.”
मी आश्चर्याने चकितच झाले ! मग मात्र मी तिच्या शिक्षणाबद्दल चवकशी केली.फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत post graduation झालेली तमारा प्रबंधाचा विषय कोणता घ्यायचा याचा विचार करत होती.

फ्रेंच आणि spanish भाषेचा प्रभाव असलेली रोमानियन भाषा शिकताना तमाराची आणि माझी छान मैत्रीच होऊन गेली !
जुजबी भाषा शिकून मी आणि चैतन्या बुखारेस्टला राहायला गेलो. त्यानंतर काही महिन्यांनी हळू हळू या नव्या देशाबद्दल माहिती करून घेण्याची उत्सुकता आणि त्यानंतर रोमानियन साहित्याचा विशेषतः कवितांचा अभ्यास करावा असा विचार मनात आला आणि मार्गदर्शक म्हणून तमाराची मदत घेता येईल असे लक्षात आले, कारण भाषा शिकताना सहजच तिच्या बोलण्यात कवितेमध्ये या आशयाचा वेगळा शब्द वापरला जातो असा जाता जाता उल्लेख असे.

तिच्यापाशी कवितांचा विषय काढला मात्र ! ती खुशच होऊन गेली अगदी ! संवेदनशील तमारालाही कवितांचं खूप प्रेम .मग आम्ही ठरवलं, कि काही ४-५ रोमानियन कवींच्या थोड्या थोड्या कविता आम्ही अभ्यासायच्या आणि त्यातून मला जो कवी जास्त भावेल , त्याच्या कविता नंतर अभ्यासायच्या.
यानंतर एक एक कविता घेऊन त्याचे इंग्रजीत ती विवेचन करी आणि रोमानियन शब्दांचा, वाक्प्रचारांचा त्या संदर्भात अर्थ. नव्या देशाची कविता शिकताना त्या देशातील चालीरीती, कधी सण – उत्सव ,रूढी परंपरा, समजुती आणि अशा अनेक पदारांबद्दल चर्चा चालू झाली आणि खर्या अर्थाने मी रोमानियाला समजून घेऊ लागले !

मिहाई एमिनेस्कु , जाॅर्ज बकोविया , निकिता स्तनेस्कू आदी कवींच्या कविता वाचताना निकिताची कविता वाचली semn -1 (खुण -1) नावाची .आणि त्याच्याच आणखी कविता वाचताना मनानी ग्वाही दिली. यापुढे जास्त करून निकिता स्तनेस्कू चा अभ्यास करायचा म्हणून !
हा अभ्यास आता चालू झालाय ,त्याच्या काही कविता आणि इतरही काही कवींच्या कविता तुमच्या भेटीला घेऊन येतेय !

या कवितांबरोबरच तमाराच्या आणि माझ्या नात्याचा प्रवास रोमानियन भाषेची विद्यार्थिनी- शिक्षिका पासून मैत्रिणी आणि नंतर जीवश्च कंठश्च मैत्रिणी इथपर्यंत झाला .

अधून मधून तिलाही तुमच्या भेटीला घेऊन येईन हे नक्की !

Monday, February 18, 2013

मला भेटलेल्या कविता : 1

1 . Joc cu avioane

Era un joc rotund de avioane:
unele erau aurii,
altele argintii.

Uite-așa: o jumătate de cerc,
de la stânga, sus,
până jos, lângă acoperișe
… și apoi până sus, la dreapta,
aurii, argintii.

Cum se mai rostogoleau
aurii, argintii…

După-aceea a pierit casa vecinului
și casa din colț
și casa de-alături…

Și eu, de mirare,
clătinam din cap:
uite, nu mai e o casă!…
uite, nu mai e o casă!…
uite, nu mai e o casă!…


१  जॉक कु आव्हिओआने

येरा उन जॉक रोतुन्द दि आव्हिओआने
उनेले येराउ आउरि ,
आल्तेले आर्जिंती.

उइता-शा ओ जुमातते दे चेर्क
दे ला स्तन्गा सुस
पुन जॉस लँगा आकोपेरिशे
शी अपोई पुन सुस , ला द्र्याप्ता ,
आउरि , आर्जिंती .

कुमसे माई रोस्तो गोल्याउ
आउरि आर्जिंती.

दुप च्ये आ पियरित कासा वेचिनुलुइ
शी कासा दिन कोल्ट
शी कासा दे अल्तुरि....

शी येउ दे मिरारे
क्लातिनाम  दिन काप
युइते नु माई अकासा!
 युइते  नु माई अकासा !
युइते नु माइ अकासा !


1. विमानांचा खेळ

ते नृत्य वर्तुळान्मधून पुढे सरकत होतं – विमानांमधून :
काही सोनेरी ,
काही रुपेरी.
ती फिरत होती : अर्धवर्तुळात
डावीकडे, वर जात ,
मग खाली येत , छपरांवरून
......नंतर वर , उजवीकडे
सोनेरी , रुपेरी .

कशी गिरक्या घेत होती ,पडताना
सोनेरी , रुपेरी.....

त्यानंतर एका शेजार्याचे घर मृत्यू पावले.
मग कोपर्यावरचे घर
आणि शेजार्यांचे घर

मी चकित झालो
आणि डोके हलवले
पहा, त्या तिकडे एकही घर नाही ......
पहा, या इकडे एकही घर नाही......
पहा ,इथे एकही घर नाही .....


एका लहान-८-९ वर्षाच्या मुलानी पाहिलेला आपल्याच गावावरील बॉम्ब हल्ला !
जणू विमानांचा चाललाय खेळ ! विमानं गोल- अर्धगोलाकार वर्तुळातून वर खाली, डावी- उजवीकडे झेपावताहेत आणि त्यांच्यामधून पडताहेत खाली सोनेरी-रुपेरी (बॉम्बज) पण या छोट्या मुलाला बॉंम्बज म्हणजे काय कुठे कळतंय ! त्याला जणू आतीशबाजीचा खेळच वाटतो आहे ! आणि जेव्हा घरे नाहीशी होताना दिसतात, तेंव्हा मात्र ते दारूण सत्य त्याला जाणवतं ! घर मृत्युमुखी पडलंय , तो म्हणतो ! घर म्हणजे घराचं एक जिवंत अस्तित्व, त्यातली माणसे, त्या छोट्याचे त्यात राहणारे मित्र-मैत्रिणी- घरातली मांजर, कुत्रा आणि आणखीही पाळीव प्राणी...
आत्ता ही सारी माझ्या ओळखीची घरं होती, आणि आता इथे काहीच राहिलं नाही !!!
कवी निकिता स्तनेस्कू १९३३ मध्ये जन्मला आणि काही वर्षातच दुसर्या महायुद्धाने रोमानियातले जनसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त केले....


मला भेटलेल्या कविता : 2

रोमानियाचा अत्यंत लाडका contemporary कवि निकिता स्तनेस्कू - 20 व्या शतकातील महत्वाचा कवि !
1933 मधे जन्मला आणि अतिशय लहान वयाचा - दुसर्या महायुद्धात जर्जर झालेल्या रोमानियाचा - अत्यंत संवेदनशील साक्शीदार !
महायुद्धाच्या काळात रोमानियावर झालेल्या हवाई हल्ल्यावरची ही त्याची अतिशय बोलकी कविता -

2. Sfârşit de bombardament

Ai scăpat creta din mână
și ușa bătută în scânduri s-a dat de perete:

cerul s-a arătat, pieziș,
acoperit de paianjeni
care mâncau copiii uciși.

Cineva ți-a dus departe
zidurile
și gutuiul
și scara.

Tu pândeai primăvara
nerăbdător, cum aștepți
o eclipsă de lună.

Către zori ți-au dus departe
și gardul
pe care-l însemnai cu o dungă,

să nu cumva să rătăcească berzele,
când vor veni,
primăvara….


2. एका हवाई हल्ल्याचा शेवट

तू तुझा खडू खाली टाकलास
आणि भग्न दरवाजा भिंतीवर धडकला

आभाळाचा काही भाग झाकोळला होता
कोळ्यांच्या जाळ्यानी.
मुलांच्या खुनांवर पोसलेल्या

कुणीतरी घेऊन गेल होतं
भिंती
फळझाड
आणि जिने .

वसंत ऋतूमागे तू शोधत होतास
अधीरपणे ,जशी काही तुला अपेक्षा होती
चंद्र ग्रहणाची .

पहाटेपर्यंत ते घेऊन गेले
कुंपण सुद्धा
ज्यावर तू सही खरडली होतीस ,

करकोचांनी रस्ता चुकू नये म्हणून
पुन्हा परतताना
वसंत ऋतूत .


बाँबस्फोटानंतर इतकं खिळखिळं झालं होतं दार, कि छोट्याशा खडूच्या खाली पडण्याच्या एवढ्याशा आवाजाने सुद्धा ते हललं आणि भिंतीवर आपटलं !

आभाळाकडे पहावं तर बरंचसं आभाळ झाकून गेलंय्, बाँबस्फोटानंतर आभाळात उडालेल्या काळ्या कणांनी....
पण ते कोळ्याच्या जाळ्यासारखे दिसतायत्...जर्मनी आणि रशिया यांच्यामधे महायुद्धाच्या जाळ्यात सापडलेल्या छोट्या रोमानियाची अवस्था कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या माशीसारखी झाली आहे !
अश्राप बालकांप्रमाणे रोमानियन लोकांचे या युद्धात बळी गेले आहेत.

वसंत ऋतूमागे तू शोधत होतास... ..शोधणे इथे hunt शिकार करणे या अर्थाने आलंय्, (pandeai) शिकार ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती. युद्ध संहारानंतर माणुसकी राहिली नाहीय् शिल्लक..सर्वस्व लुटल्या गेलेल्या प्राण्याची अस्तित्वासाठी धडपड फक्त..(basic instinct of an animal for survival)
जशी काही तुला अपेक्षा होती चंद्र ग्रहणाची ..जणू चंद्र ग्रहणानंतर पुन्हा आलेल्या प्रकाशात नवी सृष्टी दृष्टीपथात येणार आहे ! संपूर्ण अंधारानंतर पुन्हा नवी सुरुवात ! हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे जग थांबलेलं असतं.. जणू काही मृतवत झालेली सृष्टी वसंतात नव्याने जन्मते ..जणू आता इतक काही वाईट होऊन गेलेलं आहे कि फक्त आणि फक्त चांगलंच होणार हा ईश्वराची संदेश आहे. कारण चंद्रग्रहण रोमानियन संस्कृतीत अशी घटना मानली गेलंय कि त्या माध्यमातून तुम्हाला काही ईश्वरी संदेश मिळत असतो .ज्यानंतर खूप चांगलं घडतं काहीतरी किंवा खूप वाईट..आपणही म्हणतोच की - चंद्रग्रहणानंतर काहीतरी वाईट घडणारेय् किंवा कधी काहीतरी खूप चांगलं..
पण सुरक्षेसाठी असलेलं ..राहिलेलं शेवटचं कुंपण..तेही पहाटेपर्यंत हिरावून घेतलं गेलं होतं ..
घरातल्या – कुटुंबातल्या लोकांच छप्पर तर गेलच ..पण वसंत ऋतूत स्थलांतर करून येणाऱ्या करकोच्यांचं घरटंही ! स्थलांतरित पक्षी पुन्हा पूर्वी बांधलेल्या घरट्यातच राहायला येतात...
...त्यांना घराची खुण म्हणून खरडलेल्या सही सकट कुंपणही युद्धानी लुटलं .... |

Wednesday, February 13, 2013

रोमानियन स्त्रीचे जागतिक स्तरावरील स्थान :2


१९५० ते १९८२ पर्यंतची आपली जगप्रसिद्ध कारकीर्द करणारी ‘व्हर्जिनिया झिआनी’ ही सोप्रोनो गायिका .’कमेंदेतोर of द इटालियन रिपब्लिक’ हे व इतरही अनेक जागतिक स्तरावरील बक्षिसे तिने मिळवली .रोमानियाच्या ‘किंग मिशेल’ ने ‘Nihil Sine Dio’ हा सर्वात मोठा खिताब तिला दिला . गलात्स ची ‘इलियाना कोत्रुबास’ या सोप्रनो गायिकेने १९६५ मध्ये नेदरलँड्स मधली ‘एस हरटोजेनबोश’ ही महत्वाची स्पर्धा जिंकली . अनेक गाणी गाऊनतिने जगभरात आपले नाव केले . तीमिश्वारा शहरातील आयोलंडा बलाश ऑलिम्पिक चम्पियन होती.’जगातील ६ फुटापेक्षा जास्त उंच उडी मारणारी’ ही पहिली स्त्री’ रोम मधील १९६० सालच्या ऑलिम्पिकमध्ये तिने २ गोल्ड्स मिळवली . १९५७ ते ६६ पर्यंत १५० स्पर्धा तिने जिंकल्या !
बुखारेस्त च्या ‘लिया मनोलिऊ’ ने थाळीफेक मध्ये ३ ऑलिम्पिक मिळवली. ३५ व्या वर्षी वाढलेल्या वयामुळे रोमानियन टीम मधून काढून टाकलेल्या ‘लिया’ ने स्वतः प्रक्टिस करून १९६८ मधल्या ऑलिम्पिक मध्ये गोल्ड पटकावले. पुढे १९९२ ते ९६ या काळात ती रोमनिअन सिनेट मेम्बर (लेजिस्लेचर) झाली. १९४८, ४९,५० ची टेनिस टूरनामेनटस ची टायटल्स घेणारी ‘व्हर्जिनिया रुझीची’, १९७८ ची फ्रेंच ओपन चेम्पियान्शीप तिनं मिळवली. १९७३ चं ऑस्कर पटकावणारी ‘आना असलान’ , जगप्रसिद्ध बायोफिजीसिस्ट ‘फ्लोरेन्तिना मोसोरा’ आणि अशा कितीतरी ! रोमानियाची अंतर्गत परिस्थिती प्रतिकूल असतानाचे रोमानियन स्त्रीचे हे यश अधिकच उठून दिसते !रोमानियाचा अध्यक्ष चाउशेस्कू असताना १९७७ ते १९८१ या काळात रोमानिया वर परदेशी कर्जांचा बोजा एकदम वाढला, तो तीन बिलियन अमेरिकन डॉलर्स वरून १० बिलियन अमेरिकन डॉलर्स वर गेला. चाउशेस्कूच्या स्वतंत्र धोरणांमुळे IMF (International Financial Organisation) व जागतिक बँक आणि चाउशेस्कू यांच्यातील संघर्ष वाढू लागला . यामुळे इतर कुठल्याही राष्ट्रांची मदत न घेता १९८९ पर्यंत चाउशेस्कूने रोमानियन जनतेवर अन्याय करत ह्या कर्जाची परतफेड केली. यासाठी अन्नधान्य आणि कारखान्यातील उत्पादने परस्पर निर्यात केली जाऊ लागली . जनतेच्या खाण्या-पिण्या वर निर्बंध लादले गेले.देशांतर्गत अर्थ व्यवस्था कोलमडली. या काळात रोमानियन स्त्री ला घराबाहेर पडून काम करावे लागले तरी घरातील तिची जबाबदारी घरच्या पुरुषाने वाटून घेतली नाही. युद्धकाळात लोकसंख्या कमी झाल्याने गर्भनिरोधाकांवर बंदी आली आणि संतती नियमन कायदा विरोधी मानले गेले.
या कम्युनिस्ट राज्यात प्रत्येक घराला एक छोटे कार्ड मिळे. त्यावर घरात रहाणार्या सदस्यांची नवे व वये लिहिलेली असत. आपल्या पैशानेच परंतु प्रत्येक व्यक्तीला अर्धा ब्रेड दिवसाला मिळे. व त्या कार्डावर त्या तारखेवर फुली मारली जाई. त्यानंतर त्या किंवा इतर कोणत्याही दुकानात पैसे असूनही ब्रेड विकत घेता येत नसे ! प्रत्येकाला एक ग्लास दुध मिळे .त्यासाठी दर रोज पहाटे तीन पासून रांगेत उभे राहा ! तुमचा नंबर आल्यावेळी तुम्ही हजार नसलात, तर तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला दुध मिळणार नाही. अशा रीतीने खाण्यापिण्यावर निर्बंध आणि संतती नियामानावर बंदी ! स्त्रिया भीतीने गुपचूप गर्भपात करवून घेत. त्या काळात तिला योग्य ते उपचार व औषधेही मिळवता येत नसत .कारण कुणाला कळून बातमी सरकारपर्यंत गेली तर कारावास ! समाजात ठीक ठिकाणी चाउशेस्कूचे खबरे असत. आपली जिवलग मैत्रीण किंवा शेजारीणही खबरी असण्याची शक्यता ! हे दडपण सतत असे. सारiच चोरीचा मामला ! त्यामुळे स्त्रिया व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण त्यावेळी रोमानियात इतर सर्व युरोपियन राष्ट्रांपेक्षा कितीतरी जास्त होते !१९८९ च्या डिसेंबर मध्ये रोमानियात रक्तरंजित क्रांती झाली. १९९० पर्यंत रोमानिया खर्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकले नाही. समुद्रातील एखाद्या छोट्या बेटाप्रमाणे इतर सर्व जगाशी संपर्क तुटलेल्या रोमानियाची कल्पनाही आपल्याला भयावह वाटते !
अर्थातच कम्युनिस्ट कंट्री असल्याने विशेष कौशल्य असणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षणाची , राहण्या खाण्याची काळजी घेणे व जागतिक पातळीवर त्यांना संधी देणे हे मोठे काम सरकारने केले हे उघडच आहे. पण देशातील हiलाखीच्या परिस्थितीमुळे खचून न जाता मेहनत व प्रयत्नातील सातत्य रोमानियन स्त्रीने सोडले नाही हे प्रकर्षाने जाणवते. १९८९ च्या क्रांतीनंतरही (युरोपियन कम्युनिस्ट देशांपैकी सर्वात पहिली क्रांती रोमानियात झाली आणि कम्युनिझमच्या सर्वात तीव्र झळाही रोमानियालाच लागल्या .)रोमानियन स्त्री घराबाहेर पडून काम करतच राहिली . आता तिच्या पुढे आदर्श होता पश्चिमी युरोपियन स्त्रीचा आणि अमेरिकन स्त्रीचा .आता रोमानियन स्त्रियांना जास्त हक्क मिळाले . गर्भापातावरील व गर्भनिरोधाकांवरील बंदी उठवली गेली . पूर्वी बाळंतपणासाठी फक्त ६० दिवस राजा मिळत असे, ती आता दोन वर्षांपर्यंत वाढवली गेली आहे आणि लहान मुलांच्या संगोपनासाठी ही राजा आई-वडील या दोहोंपैकी कुणालाही घेता येते.अर्थातच ज्याचा पगार कमी , त्याने ही राजा घ्यायची अशी विभागणी असते.
रोमानियन्स हे ओर्थोडोक्स ख्रिश्चन्स आहेत. आजही समाजामध्ये चर्चमध्ये जाऊन लग्न करणे हे महत्वाचे मानले जाते . या परंपराप्रिय समाजामध्ये लग्नसंस्थेबद्दल आदर आहे, कुटुंबव्यवस्थेवर विश्वास आहे. रोमानियन स्त्रीला आपलं घर आणि घरसंसार सांभाळण्याच आपलं कौशल्य यांचा अभिमान वाटतो. शहरी स्त्रिया पश्चिमी स्त्रियांप्रमाणे पेहेराव करतात तर खेड्यातील स्त्री पारंपारिक पेहेरावात दिसते . भौतिक गोष्टींपेक्षा नवर्याचे प्रेम व परस्पर विश्वास या गोष्टींना ती जास्त महत्व देते. सुंदर, सडपातळ व आपल्या दिसण्याविषयी विशेष काळजी घेणारी ही स्त्री चटकन नजरेत भरते. माणुसकी, धार्मिकता, दयाळूपणा या गुणांकडे ती सहज आकर्षित होते. शहरी स्त्री उद्योग-व्यवसाय , नोकरी यांकडे वळली आहे पण खेड्यातील स्त्रिया अजूनही नोकरीच्या अभावी घरकाम, शेतावर काम करणे व मुलांना वाढवणे अशी कामे करतात. एका मोठ्या international co. त ह्युमन रिसोर्सेस manager चे पद सांभाळणारी ‘नेल्या’ म्हणते,” शहरातील स्त्रिया मोठ्या प्रमाणावर managers म्हणून काम करतात. त्या उच्चशिक्षित असून ५ वर्षे जॉब केल्यावर नवीन चालेंजेसना सामोरे जाण्यासाठी नोकरी बदलण्याची तिची तयारी असते. बिझनेस असोसिएट, डायरेक्टर अशा मोठ्या पदावर असलेल्या स्त्रियांना पगार आणि इतर सवलती पुरुषांच्या बरोबरीने मिळतात.”
“पण ही समानता घरी आल्याबरोबर संपून जाते .” तमारा म्हणते. “बाहेर रोमानियन स्त्री पुरुषाच्या बरोबरीने काम करते. आणि घरी आल्यावर रोमानियन पुरुष चहा पीत वर्तमानपत्र वाचत बसतो.त्याला घरकाम करणे अपमानास्पद वाटते. स्त्रीला स्वैपाक, धुणीभांडी, स्वच्छता, मुलांचे अभ्यास घेणे हे सर्व एकटीला करावे लागते. थोडक्यात काय, स्त्रियांना घरच्या सर्व जबाबदार्या व व्यावसायिक जबाबदार्या अशी तारेवरची कसरत करावी लागते.
रोमानियन स्त्री तिची जिद्द, चिकाटी, मेहनती स्वभाव आणि जास्त तास थांबून काम करण्याची तयारी या गुणांमुळे नोकरीच्या जागी ओळखली जाते.परंतु नोकरीच्यi जागीसुद्धा खुपजण पारंपारिक विचारांचे असतात. त्यामुळे ‘ही कामे स्त्रियांची-ही कामे पुरुषांची हा भेद असतोच. यामुळे तिला हव्या त्या पद्धतीने करियर घडवता येत नाही . स्त्रीची योग्यता व पदव्या पुरुषाच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त असल्या तरी त्याच पदासाठी तिला तिची पात्रता सिद्ध करण्यासाठी जास्त तास थांबून कामे करावी लागतात. आणि पगार मिळताना मात्र त्याच पदावर काम करणाऱ्या पुरुषाला स्त्रीपेक्षा पुष्कळदा जास्त पगार मिळतो .” नेल्या म्हणते,”बाळंतपणासाठी इथे दोन वर्षेपर्यंत राजा मिळते, व त्यानंतर त्याच जागी , काम करण्याची संधीही . पण हीच संधी आम्हाला कामाच्या जागी दुय्यम स्थान देते.” फनिका (नाव बदलले आहे.) ही इंजिनियर म्हणून ज्या कंपनीत काम करत असे, ती कम्पनी बंद पडल्यामुळे बेरोजगार झाली. त्यानंतर तिने एका छोट्याशा गावी हॉटेल चालवले. रोमानिया हे युरोपियन युनियन मधील एक राष्ट्र . इथे बेरोजगार व्यक्तींना युरोपियन युनियन तर्फे व्यवसायासाठी कर्ज मिळते. फनिका स्वतः इंजिनियर असून, तिच्याकडे कल्पक योजना असूनही रोमानियन पारंपारिक विचारसरणीच्या आणि पुरुषसत्ताक पद्धतीच्या समाजात तिला या फंडासाठी स्वतः च्या नावात अर्ज करता आला नाही. कर्जासाठी तिला नवर्याच्या नावानेच अर्ज करावा लागला.
हे कमी आहे कि काय म्हणून इथे घरगुती अत्याचार ,विनयभंग, बलात्कार वगैरेंसाठी अजूनही स्त्रीच दोषी मानली जाते. परंपरेच्या जोखडात अडकलेली रोमानियन स्त्री आपल्या हक्कांसाठी व पुरुषांनी दिलेल्या अन्याय्य वागणुकीसाठी आवाज उठवत नाही. त्यांचा घरी अपमान होत असेल, नवर्याकडून मारहाण होत असेल तरीही त्या पोलिसात तक्रार नोंदवत नाहीत, एवढेच नवे, तर आपल्या मित्र-मैत्रिणीला वा परिवारालाही विश्वासात घेऊन या गोष्टी सांगत नाहीत कारण आपल्याला अशी वागणूक मिळते हे सांगायची त्यांना लाज वाटते.
२००३ मध्ये रोमानियात ‘द नेशनल ऑर्गनायझेशन ऑफ लिबरल वूमन’ ही संस्था स्थापन झाली. रोमानियाची ‘वूमन्स लीग’ म्हणते,’अस्तित्वाच्या या लढ्यात स्त्रियांना नगण्य स्थान आहे.’ लग्न झालेल्या स्त्रियांची गणना इथला कायदा लहान मुलांमध्ये करतो.या किंवा अशांसारख्या स्त्रीहक्कांसाठी लढा देणाऱ्या विनानफा तत्वावर चालणाऱ्या संस्था मदतीला तत्पर असूनही नवर्याविरुद्ध आवाज उठवणार्या महिलांचे प्रमाण केवळ ८-९% च आहे. काडीमोड दिली तर घर-दर जाईल,मालमत्तेची विभागणी होईल व नवीन घर घेणे किंवा भाड्याने घेणे,इतर बिले भागवणे, मुलांना सांभाळणे या सार्या गोष्टी आपल्या पगारात शक्य नाहीत असे ती म्हणते. कारण युरोप मधील आर्थिक संकटामुळे देश परिस्थितीच्या विळख्यात सापडलेला, अपुरे पगार !
इंटरनेशनल कंपनीत फायनान्स सेक्शन मध्ये काम करणारी ‘सोरीना’ म्हणते, “मुलीचे आईवडील तिला पाठींबा देण्यासाठी व आपल्या परीने मदतीसाठी तयार असतात. पण मुलगी या गोष्टी आई-वडिलांपर्यंत जाऊ देत नाही. घरातल्या गोष्टी घरातच राहतात.विशेषतः खेडेगावांमध्ये हे जास्त पाहायला मिळते.” तमारा म्हणते,”आमच्याकडे गणतंत्र राज्य आहे, पण गणतंत्र म्हणजे काय हेच समाज अजून जाणत नाही.”मिडिया व tv वर स्त्रीविषयक कार्यक्रम नाहीत असे नाही, पण बरेचसे कार्यक्रम ‘स्त्री आपल्या घराची चौकटच कशी सांभाळत बसेल’ याचा विचार करूनच दाखवले जातात.
आज अंतर-राष्ट्रीय खेळांमध्ये भरपूर गोल्ड मेडल्स मिळवणाऱ्या मुली आहेत,ऑस्कर फॉर क्लासिकल म्युझिक घेणारी अन्जेला जॉर्ज आहे, आंतरराष्ट्रीय यशासाठी २०११ चे युरोपियन बॉर्डर ब्रेकर अवार्ड घेणारी पॉप सिंगर एलेना अपोस्तोलीनू आहे,
‘If you want something said, ask a man , if you want something done, ask a woman!’ या श्रीमती मार्गारेट थाचरयांच्या उक्तीची आठवण करून देणारी ‘fortune 50 International most powerful women’ मध्ये झळकणारी- रोमानियातील सर्वात मोठ्या कंपनीची CEO – मारियाना जॉर्ज आहे!
मोठ्या शहरात स्त्री मेयर्स आहेत,राजकारणात मोठ्या पदांवर स्त्रिया आहेत,सन २००० मध्ये सिनेट वर फक्त दोन स्त्रिया होत्या आणि पार्लमेंट मध्ये ५.५% . पण आता ही सांख्य वाढते आहे. पण युरोपियन युनियनचा ३०% कोटा अजून फार दूर आहे.
आजचा रोमानियन तरुण बदलतो आहे,शहरात पुरुष स्त्रीला घरात निम्मानिम मदत करू लागला आहे. असं २५-२६ वर्षाच्या ख्रिस्तिना, वाना यांसारख्या तरुणी सांगतात.

पहिल्या जागतिक महायुद्धाच्या आधीपासून ते दुसर्या महायुद्धापर्यंत स्त्रीचे कार्यक्षेत्र घर- मुलेबाळे इथपर्यंतच मर्यादित होते. खेड्यात स्त्रीला शेतीची कामे करावी लागत.
दुसर्या महायुद्धानंतर कम्युनिझम च्या काळात स्त्रियांना बाहेर पडून काम करावेच लागले.परंतु त्यांच्या पर्स मध्ये आता काही कमाई होती. त्यामुळे आलेल्या स्वातंत्र्याची लज्जत थोड्याफार प्रमाणात चाखता येत होती.यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्की वाढला असणार. याच काळात शिक्षण सर्वांसाठी मोफत सुरु झाले आणि अगदी खेडोपाडी देखील शाळा सुरु झाल्या, याचाही फायदा स्त्रियांनी घेतला असणार !१९८९ च्या क्रांतीनंतर पब्लिक सेक्टर मध्ये जरी स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जात होती, तरी प्रायव्हेट सेक्टर्स मध्ये त्यांच्या कार्यकुशलतेची दाखल घेतली गेली आणि इथे खर्या अर्थाने रोमानियन स्त्रीची प्रगती सुरु झाली असे दिसते.
भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून राजा राम मोहन राॅय, रविन्द्रनाथ टागोर, ईश्वरचंद्र विद्यासागर, माधवराव रानडे , टिळक, आगरकर वगैरेंनी समाज सुधारणेचे कार्य हाती घेतले त्याबरोबरच स्त्रियांच्या शैक्शणिक प्रगतीसाठीही प्रयत्न सुरू झाले.धर्म, जाती व शिक्शण याबाबत या लोकोत्तर पुरुषांनी सुधारणा घडवल्या. जिथे बदलण्याची गरज होती, तिथे त्यांनी समाजाची मानसिकता बदलली, हे मोठेच कार्य ! आणि त्यांच्या बरोबर स्वर्णकुमारी देवी, रमाबाई सरस्वती, रमाबाई रानडे, मालती पटवर्धन, सरोजिनी नायडू या स्त्रियांनी हे काम पुढे नेले.
फक्त ५०% समाजाला म्हणजे स्त्रियांना परिस्थितीत बदल व्हावा असं वाटण पुरेस नसतं, परिस्थिती बदलवण्याला ते कारणीभूत होताच असं नाही.भारतामध्ये स्त्री मुक्तीसाठी केलेल्या सुधारकांच्या प्रयत्नांना हातभार लावण्याचे काम स्त्रीने केले असे दिसून येते.तरीसुद्धा खेड्यापाड्यात आजही खर्या अर्थाने स्त्री परंपरेच्या जोखडातून मुक्त झाली आहे का, हा प्रश्न राहतोच !
स्वतंत्र रोमानियात असे दिसते कि त्यांना एक जागरूक नागरिक बनण्यासाठी स्वतंत्र रोमानियाचे सुंदर स्वप्न पाहणारा समाज आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणारा नेता मिळाला नाही. याचे कारण कम्युनिझमच्या काळातच समाजातले विचारवंत तुरुंगात टाकले गेले, किंवा देश सोडून निघून गेले. आजही उच्चशिक्षितानचा काल देश सोडून जाण्याकडे दिसतो.
इथे रोमानियन स्त्रीचा झगडा स्वतःसाठी खर्या अर्थाने एकटीचाच आहे , कारण कम्युनिझमच्या काळात नागरिकांची वैयक्तिक मालमत्ता सरकारजमा होऊन सर्वांना राहायला सरकारी घरे, समान पगार, सारखे जेवण-खाण ! या सिस्टीमचा इतका धसका रोमानियन नागरिकाने घेतला आहे, कि जो तो स्वतः पुरतेच पाहतो. म्हणजे आपलi ओनरशिप flat अगदी स्वच्छ व सुंदर सजवलेलi असतो , पण घराबाहेरचा कॉमन जिना स्वच्छ करण्याची जबाबदारी कोणीच घेऊ इच्छित नाही कारण ती कॉमन property आहे. अशा मानसिकतेचा परिणाम म्हणून स्त्रियांनी एकत्रित होऊन स्वतःच्या प्रगतीसाठी पाऊल पुढे टाकणे रोमानियन स्त्रीला शक्य होत नाही.आणि ही मानसिकता बदलण्यासाठी ज्या नेत्याची गरज आज रोमानियाला आहे, त्याची चाहूल दूरदूर पर्यंत लागत नाही.तरीही सर्व शक्तीनिशी रोमानियन स्त्री आपल्या प्रगतीसाठी झटते आहे असेच चित्र इथे दिसते. पण या मुठभर स्त्रियांची प्रगती म्हणजे सर्व रोमानियन स्त्रियांची प्रगती असे सरसकट विधान करता येत नाही.खेड्यांमध्ये आजही ८ वी च्या पुढचे शिक्षण मिळू शकत नाही व शहराच्या गावी मुलांना शिक्षणासाठी पाठवायचे तर राहणे-खाणे व इतर खर्च करणे पैशांच्या अभावी शक्य नाही.काहींना मुलांच्या शिक्षणाचे महत्व काय आहे, याचीच अद्याप समाज नाही.
जो आत्मविश्वास आज भारतीय स्त्री मध्ये दिसतो, तो सर्व-सामान्य रोमानियन स्त्री मध्ये नाही कारण पुरुषसत्ताकपद्धत हे एक आणि वर्षानुवर्षे कम्युनिस्ट नेत्यांनी आपल्या हाती घेतलेले निर्णयाचे अधिकार.तरी शहरी तरुण पिढीत स्त्री व पुरुष दोघेही हातात हात घालून चालताना दिसतात. घर स्त्रीच्या मालकीचे कि पुरुषाच्या याचा विचार न करता रोमानियन स्त्री परस्पर विश्वास व प्रेम हा सुखी जीवनाचा पाया समजून लग्न करते आणि पुरुष घरातल्या जबाबदार्या वाटून घेतो, स्त्रीच्या करियर साठी प्रसंगी नोकरी बाजूला ठेवून मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेतो हा बदल नक्कीच आश्वासक आहे !

उज्वला अन्नछत्रे
बुखारेस्ट .